भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांना नक्की काय साधायचे आहे?
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या यात्रेचा हेतू देश जोडण्यासाठी असल्याचे बोलले गेले आहे. हि यात्रा प्रत्येक वर्गाच्या लोकांना सोबत घेऊन सुरु केली गेली आहे. देशातील लाखो नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत. मात्र या यात्रेतून राहुल गांधी यांना नक्की काय साधायचे आहे? याचा काँग्रेसला फायदा होईल का? ही यात्रा सुरु करण्याची नक्की आवश्यकता का पडली? आणि नुकतच कोर्टाने भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवर रोक का लावली? हेच या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. (What exactly does Rahul Gandhi want to achieve from Bharat Jodo Yatra?)
७ सप्टेंबरला भारत जोडो यात्रेची सुरुवात करण्यात आली. ही यात्रा तब्बल ३५७० किलोमीटरचा प्रवास निश्चित करणार असून, यात १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. आथिर्क, सामाजिक आणि राजनैतिक दृष्ट्या देशातील नागरिकांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे, तो दुरावा मिटविण्याचे काम भारत जोडो यात्रा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना लोकांवर काँग्रेसचा प्रभाव टाकायचा आहे ज्याचा फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकांच्या काळात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या यात्रेच्या अगदी सुरुवातीपासूनच राहुल गांधी यांना लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतांना दिसत आहे. यात राहुल गांधी यांचा मुख्य उद्देश काँग्रेस पार्टी अजून मजबूत करणे हाच आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच उम्मेदवार मानलं जात आहे. सध्या नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे, मात्र ते अशा प्रकारे कधीच जनतेत गेले नाही, पत्रकार परिषद घेतल्या नाहीत.. हाच मुद्दा हाती घेऊन या यात्रेद्वारे नरेंद्र मोदींवर देखील थेट निशाणा साधण्यात आला आहे.
आता लवकरच हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका असतील, याकरिता प्रत्येक पक्ष जोरदार मेहनत घेत आहे. मात्र जर का या दोन ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडून आला तर याच थेट श्रेय राहुल गांधींनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेलाच जाईल. आणि जर का काँग्रेस पक्ष पराभूत झाला, मग मात्र या यात्रेचा फायदा कितपत झाला हा प्रश्न उपस्थित होईल.
ही यात्रा जर का यशस्वीरीत्या पार पडली तर, यामुळे राहुल गांधींची पूर्वी काही वर्षात स्थापित झालेल्या प्रतिमेत नक्कीच सुधारणा होईल. राहुल गांधी आपल्या प्रतिमा सुधारणे कडे देखील लक्ष देतांना दिसत आहे, आईच्या बुटांची लेस बांधणं, तरुणांसोबत फोटोज काढणं, पाऊसात भिजत भाषण करण यांसारख्या अनेक गोष्टी ते करतांना दिसत आहेत. दुसर म्हणजे निवडणुकांमध्ये मागे पडलेल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनावर देखील याचा चांगला प्रभाव पडेल.
आतापर्यंत या भारत जोडो यात्रेला कोणतही गालबोट लागलं नव्हतं व ही यात्रा अगदी सुरळीत रित्या सुरु होती, मात्र नुकताच कोर्टाने भारत जोडो यात्रेचे ट्विटर हॅण्डल बंद करण्याचे आदेश दिले. हे केवळ त्यांच्या यात्रेच्या एका व्हिडिओमध्ये केजीएफ २ चित्रपटाचं गाणं बेकायदेशीर स्वरूपात वापरल्यामुळे. कोर्टाच्या पुढील सुनावणी पर्यंत त्यांचे ट्विटर अकाउंट बंद ठेवण्यात आले आहे.
या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी पाच राज्य कव्हर केली आहेत. आता या यात्रेचा परिणाम २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर कितपत पडेल, हे येणार काळच सांगेल.