खैबर खिंड भारतासाठी शाप की वरदान?
खैबर खिंड भारताला लाभलेले वरदान की शाप हा मोठा प्रश्न आहे. वरदान म्हणावे तर इथूनच भारतावर आक्रमण कर्त्यांनी आक्रमण केले. आणि शाप म्हणावा तर खिंडीची भौगोलिक रचना केवळ आणि केवळ वरदान असल्याचे दिसते. तसा ह्या खैबर खिंडीला मोठा इतिहास लाभला आहे. जणू मृत्यूच्या जबड्यात स्वतःला अडकवून घेणे म्हणजेच खैबरखिंडीत प्रवेश करणे. ह्या खिंडीची रचना, तिचे भौगोलिक महत्व, तिथे घडलेला इतिहास आणि एकूण ही खिंड वरदान की शाप हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
खैबर खिंड ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा भागावर आहे. अर्थात भारत पाकिस्तान पूर्वी एकच देश असल्याने ही खिंड भारतात होती, असे समजते. अफगाणिस्तानचा काही भाग देखील भारतातच होता. तसे वेदांमध्ये अनेक उल्लेख आहेत पण इतिहासकारांची ह्या बाबतीत अनेक मतं आहेत.
तर ह्या अफगाणिस्तानमधील काबुल पासून ते आजच्या पाकिस्तानातील पेशावरपर्यंत ही खैबर खिंड पसरलेली आहे. पेशावरपासून अकरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाब-ए-खैबर इथे आता एक मोठे द्वार उभे करण्यात आले आहे. तिथूनच ही खैबर खिंड सुरू होते.
खिंडीत प्रवेश केल्यावर जणू मृत्यूच्या काळदाढीत ओढल्याचा भास आपल्याला होतो. इतकी लांब आणि भयानक असणारी ही खिंड एखाद्या भुलभुलैयाप्रमाणे भासते. ह्या खिंडीने कैक शत्रूंना झुकवले आहे. असे म्हणतात जगातील सर्वात जास्त युद्ध ह्याच खिंडीत झालेली आहेत.
खैबर खिंड तशी अनेक वळणे घेत पुढे जाते. हजारो फूट उंच डोंगरांमध्ये आपलाच जीव घाबरा होतो. शत्रू जेव्हा इथून चालत असेल तेव्हा किती भयानक वातावरण भासत असेल ह्याचा विचार करणेच अशक्य. जरा मोठा पल्ला गाठल्यानंतर एक जागा अशी आहे जिथे चालण्यासाठी अगदी तीन ते चार मीटरचा रस्ता दिसतो.
आणि हीच जागा शत्रूला नमवण्यासाठी योग्य आहे. इथे अडकल्यानंतर शत्रू नाक मुठीत घेऊन शरण येईल इतके नक्की. कारण ह्याच ठिकाणी वर बसून शत्रूवर नेम धरून हल्ला करता येतो आणि त्यास हरवता येते. इतके असूनही ह्या खिंडीतून अनेकांनी प्रवेश केला. ह्याची सुरुवात होते आर्य लोकांपासून. असे म्हणतात आर्यांनी इथून सर्वात पहिले प्रवेश केला होता.
ह्या खैबर खिंडीतून प्रवेश करण्याची परंपरा नंतर सुरूच राहिली. ह्या ठिकाणी नंतर आफ्रिदी लोकांचे अर्थात अफगाणच्या एका समुदायाचे वर्चस्व राहिले होते. अलेक्सॅन्डर देखील भारतात आला तेव्हा ह्याच वाटेने आला होता असे इतिहासकर सांगतात.
पण दुसरी मान्यता अशी आहे की इथे अलेक्सॅन्डर आल्यानंतर त्याला कडवा विरोध ह्या आफ्रिदी लोकांनी केला. अलेक्सॅन्डरच्या आईला हे समजताच तिने काही आफ्रिदी लोकांना भोजन समारंभास बोलावले. पण तिथे काही वाद झाल्यामुळे अलेक्सॅन्डरला त्याच्या आईने दुसऱ्या मार्गाने जाण्याचे पत्र धाडले. अलेक्सॅन्डरने मार्ग बदलला असला तरी त्याला खिंडीत असताना खूप त्रास झाला होता, ज्यामुळे त्याला आफ्रिदी लोकांसमोर झुकावे लागले होते.
ह्या नंतर बाबर आणि अनेक इस्लामी आक्रमण कर्त्यांनी इथून प्रवेश केल्याचे उल्लेख सापडतात. नंतरच्या काळात महाराजा रणजित सिंग ह्यांना ह्या अफगाणी लोकांवर वर्चस्व ठेवायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या सेनापतीला अर्थात हरी सिंगला इथे कूच करण्यास सांगितले.
हरिसिंगने इथल्या काही अफगाणी लोकांना त्रास दिला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. खिंड भक्कम असल्यामुळे थेट आत शिरून हल्ला करणे शक्य नाही, हे जाणून १८३६ दरम्यान हरिसिंग ह्यांनी तिथेच जवळ एक किल्ला बांधायला सुरुवात केली. तिथल्या धनाढ्य असणाऱ्या मोहम्मद खानाने ह्या बांधकामाला विरोध करून हरिसिंगवर हल्ला केला.
त्यात हरिसिंग निधन पावले. अशी ही खैबर खिंड भारतीयांसाठी शाप ठरली. इंग्रजांनी देखील व्यापार चालावा म्हणून आफ्रिदी लोकांना १० लाख २५ हजार रुपये वर्षाला दिले. पण तरी ह्या आफ्रिदी लोकांनी ह्या इंग्रजांना एकदा खिंडीत धरले होते. तेव्हा आफ्रिदी लोकांनी इंग्रजांना चांगलेच लुटले होते.
आजवर झालेल्या आक्रमानांमुळे आपण ह्या खिंडीला शाप म्हणतो आहोत पण इथूनच भारत देश इतर देशांसोबत व्यापार करायचा त्यामुळे ही खैबर खिंड एक वरदान देखील ठरते. केवळ गरज होती त्या खिंडीचे अधिपत्य आपल्याच हाती ठेवण्याची. हिमालय जसे आपले रक्षण करतो तसेच ही खिंड रक्षण आणि भक्षण दोन्ही करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ही कमेंट करून नक्की सांगा.